औरंगाबाद|कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रादुर्भाव वाढणार नाही यांची दक्षता घेत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण सामाजिक भान राखत साधेपणाने घरातच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
![]() |
फोटो: भास्कर निकाळजे |
आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव व मोहरम मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्येक्षतेखाली एम.जी.एम.महाविदयालयाच्या रूख्मिनी सभागृहत पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पैठण) गोरख भामरे, विभागातील पोलीस अधिकारी, भगवान फॉर्मसी महाविदयालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाले, जिल्हा, तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचयात, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य संबधित गावाचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, आपण दरवर्षी सण-उत्सव मोठया उत्सावाने साजरे करीत असतो. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट असून या संकटाने आपल्या सर्वांना खुप काही शिकवले आहे. कोरोनामुळे आपल्या जीवणाची दशा आणि दिशा बदलेली आहे. पोलीस प्रशासन आणि पोलीसांनी सैनिकांप्रमाणे काम करीत माणुसूकीचे दर्शन घडविले आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच बऱ्याच गावांतील गणेशोत्सव मंडळानी यावर्षी हे सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला त्यांचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी कौतूक केले. त्याच बरोबर जे गणेशोत्सव, मोहरम साजरा करीत आहे त्यांनी मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करीत प्रशासकीय सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. कोरोना संकटातून बाहेर पडतांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून उद्योगांना उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठा योजना, कृषी क्षेत्र यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील म्हणाल्या की, गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे. तसेच मनात भक्तीभाव ठेवून घरीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. शासनाच्या या आवाहनास सर्वांनी पाठींबा दर्शविल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचेही अभिनंदन केले.
श्रीमती पाटील म्हणाल्या की, आतापर्यंत आपण सर्व सण घरातच शांतपणे साजरे करून सहकार्य केले आहे. कोरोना संकट काळात हातावर पोट असनारे खुप अडचणीत आहे तेव्हा आपण उत्सव साजरा करतांना सकारात्मक विचार ठेवून गरिबांना मदत करीत भक्ती दाखवून देऊ शकतो. तेव्हा सर्वांनी आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करीत व गणपती विसर्जनावेळीही गर्दी टाळायची आहे. सर्व गणेश मंडळासाठी गणपतीची मुर्ती 4 फुट तर घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी. विसर्जनाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहनातून या गणेशमुर्ती व्यवस्थित विसर्जन केले जाईल. त्याचबरोबर इतर मार्गदर्शक सूचना स्थानिक पोलीस स्टेशन व औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस यांच्या फेसबुक वर उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव काळात मिरवणूका, सांस्कृतीक कार्यक्रम, भंडारा यांना परवानगी नाही. तरी आपण डिजिटल सण साजरा करू शकतो. यासाठी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा, निबंध, सेल्फी वीथ ट्री यासारख्या स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना घरपोच पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच काही गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीतून गरिबांसाठी मास्क, सॅनिटायझर देणे, रक्तदान, प्लाझ्मा दान याबाबत जनजागृती करीत नियम व शिस्त पाळत गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भगवान फार्मसी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाल यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूच्या गणेश मुर्तींची स्थापना करण्यास सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्तींचे घरच्या घरी पर्यावरणपुरक विसर्जनाची पद्धत समजावून सांगितली. ज्यात एका बादलीत मुर्तीच्या वजनानुसार अमोनियम बाय कार्बोनेट व त्याच्या पाचपट पाण्यामध्ये श्रींच्या मुर्तीचे विसर्जन केल्यास 48 तासांत मुर्ती विरघळुन जाते, विसर्जनाची ही पद्धत वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.