Skip to main content

बिगुल वाजलं

बिगुल वाजलं

अखेर झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दुसरीकडे झारखंडमध्ये दोन टप्प्यात १३ व २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांची धाकधुक वाढली असणार, लोकसभा निवडणुकीत जनतेने  महायुतीला दिलेल्या झटक्याने चिंतेत असलेल्या युतीला हरियाणा निकालाने कॉन्फिडन्स दिला आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी अनेक योजनांचे आमिष दाखवून आमचे सरकार किती लोकाभिमुख आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा किती फायदा येणाऱ्या काळात युतीला होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे मानले जात असतानाच तिसरी आघाडी ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पारंपरिक पक्षांची डोखेदुःखी वाढणार आहे. तिसऱ्या आघाडीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येते. २०१९ वर्ष राजकारणातील नाट्यमय घडामोडीसाठी लक्षात राहील. राज्यात २०१९ ला भाजपाने १६४ जागा लढल्या होत्या, त्यात १०५ जागांवर समाधान मानावं लागलं होतं तर शिवसेना १२४ जागा लढवल्या, त्यांना ५६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजपा सेना युतीला स्पष्ट बहुमत होते. मात्र मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्षांनी दावा केल्याने अखेर युती तुटली आणि राज्यात एक नवी आघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भाजपा शिवसेनेची भूमिका पटली नसल्याने त्यांनी २०२२ मध्ये राष्ट्रवादीतील अजितदादा पवार आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना गळाला लावून महायुतीचे सरकार स्थापन केले. 

२०२२ मधील महाराष्ट्रातील तोडफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही. लोकसभेला त्याचा फटका भाजपा व मित्रपक्षांना बसला. एवढेच नाही तर महागाई, बेरोजगारी, घसरलेले कांद्याचे दर, इधांचे वाढते दर असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना सत्ता स्थापनेचा सुरू असलेला खेळ जनतेला पटला नाही. आता या सर्व महत्वाच्या मुद्द्यावर महायुती ताक ही फुंकून पेत आहे, असे चित्र दिसत आहे. भाजपला २०१९ ला ३७ टक्के मते होती. त्यामुळे महायुतीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. शिंदे आणि अजित पवार गटाने ७० ते ९० जागांवर हक्क सांगितला आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २१८ आणि काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांनी २२२ जागांबाबत आघाडीचे वाटप झाले असल्याचे सूतोवाच केले आहे. काँग्रेसने राज्यात अधिक जागांची मागणी केल्याने उध्दव ठाकरे गट व शरद पवार गटाची चलबिचल वाढली असून त्यांनी हरियाणा निकालाचे दाखले देत काँग्रेसला कमी जागांवर रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

आता तारखा जाहीर झाल्याने आम्ही सज्ज असल्याचे सांगत महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे, तर भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करुन शंखनाद केल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी २०२४ ला आपलेच सरकार येईल असे सांगून २०२९ साठी स्वबळाचा नारा ही दिल्याने खऱ्या अर्थाने भाजपाचा यंदा कस लागणार असून प्रतिष्ठापणाला लागली आहे. आघाडी सारख्या कुरबुऱ्या महायुतीत ही सुरू आहे. निवडणूक घोषणेपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहिण, उज्ज्वला योजनासह अनेक योजना जाहीर केल्या, महायुतीला याचा किती फायदा होतोे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.मात्र  २०२४ निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांची परीक्षा बघणार यात शंका नाही.

दिगंबर मराठे 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...