नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच गर्दी टाळावी आणि सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ही कडलग यांनी केले आहे.