Skip to main content

फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा औरंगाबादकरांशी संवाद; कोरोनामुक्ती लोकचळवळ व्हावी: चौधरी

औंरगाबाद/प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारिरीक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार हात साबणाने धुवा या त्रिसूत्रीचा वापर कराच, हा संदेश ‍जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज प्रथमच केलेल्या फेसबुक लाईव्हद्वारे औरंगाबादकरांशी संवाद साधताना दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Covid-19-corona-virus
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागेल. खबरदारीसाठी पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरिरातील आक्सिजनची पातळी तपासता येते. नियमितपणे तपासल्यास संभाव्य धोका टळू शकतो. मात्र, यामुळे कोरोना होणारच नाही, असे नाही. हा केवळ खबरदारीचा उपाय आहे. याचा वैद्यकीय पातळीवर उपचार घेताना बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी या ऑक्सिमीटरचा वापर करावा. वापर करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे  चौधरी यांनी दाखवली. पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून आपले आरोग्य आपल्या हाती या प्रमाणे आपणच आपली तपासणी करून  शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण, पल्स रेट तपासू शकता असेही  चौधरी  म्हणाले.

फेसबुक लाईव्हद्वारे प्रथमच संवाद साधत असलेल्या उदय चौधरी यांना औरंगाबादकरांनीही थेट प्रश्न विचारले. त्यांनी ही मनमोकळेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ‍देऊन त्यांचे समाधान केले. यामध्ये ग्रामीण भागातील लॉकडाऊन, शहरातील बस सेवा, हॉटेल, उद्योग सेवा आदींबाबत प्रश्न विचारण्यात आली. बाहेरगावाहून आल्यानंतर किती दिवस घरात अलगीकरणात रहावे, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्तीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार घरातच 14 दिवस अलगीकरणात रहावे, असे सांगितले.औरंगाबाद शहर वगळता औरंगाबाद ग्रामीण क्षेत्रात उद्योग व्यवसायाला कुठल्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. परंतु जर व्यवसायासाठी संबंधित शहरातून ये-जा करत असतील तर मात्र, अडचण निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, ‍जि.प. यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत आहे. त्यांच्यावर संनियंत्रण करून या कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही श्री. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.शेतकरी बांधवांना अडचणी येणार नाहीत, यासाठी यंत्रणा काम करत आहेत. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रे सुरू करावीत, असे निर्देशही त्यांनी लाईव्हद्वारे संबंधितांना दिलेत.

खासगी रुग्णालयातही महात्मा फुले जनआरोग्या योजनेच्या माध्यमातून आता नि:शुल्क उपचार 31 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहेत. परंतु काही रुग्णालये या योजनेंतर्गत नोंदणीकृत नसतील त्याठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारणी करणे रुग्णालयास बंधनकारक असेल. याबाबत काही अडचण असल्यास आरोग्य विभागाच्या 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या रुग्णालयाने रुग्णांकडून अतिरिक्त दर आकारणी केली अशा रुग्णालयांकडून राज्य सरकारने रक्कम वसूल करून रुग्णांना परत केली आहे, त्यामुळे अधिकची दर आकारणी होत असेल तर प्रशासनास तत्काळ कळवावे, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच उपचारापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची ग्वाहीही श्री. चौधरी यांनी दिली.शेतकऱ्यांना बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. औरंगाबाद शहर वगळता ग्रामीण भागात जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा कठीण प्रसंगात सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले.
                                       


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...