नाशिक| किरकोळ बाजारात कांद्याने ८० ते १०० रुपये किलो दर गाठला असून कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीसह आता कांदा साठवणुकीवर ही मर्यादा लागू केली आहे. किरकोळ व्यापाऱ्याला २ टन तर घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनाची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.
लिलाव बंद असल्याने कांद्याची खरेदी बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांचे ही अर्थिक नुकसान झाले. दरम्यान कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. पावसामुळे मुख्य उत्पादक महाराष्ट्रातील कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या कांदा उत्पादक राज्यांना अवकाळी आणि परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने इराण आणि इजिप्तचा कांदा आयात केला आहे. त्यामुळे एकीकडे कांदा दर घसरण्याच्या शक्यतेची टांगती तलवार तर दुसरीकडे लिलाव बंद राहिल्यास कांदा सडण्याची भीती अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडला आहे.