- लासलगाव, पिंपळगाव समितीत कांद्याचे लिलाव बंद; लिलाव सुरू करण्याची शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी - TheAnchor

Breaking

October 26, 2020

लासलगाव, पिंपळगाव समितीत कांद्याचे लिलाव बंद; लिलाव सुरू करण्याची शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी

नाशिक| किरकोळ बाजारात कांद्याने ८० ते १०० रुपये किलो दर गाठला असून कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीसह आता कांदा साठवणुकीवर ही मर्यादा लागू केली आहे. किरकोळ व्यापाऱ्याला २ टन तर घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनाची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.  
Lasalgaon-Pimpalgaon-Samiti-onion-auction-closed-Start-the-auction-Demand-of-shetkari-sanghrsh-sanghtna
फोटो:फाईल

लिलाव बंद असल्याने कांद्याची खरेदी बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांचे ही अर्थिक नुकसान झाले. दरम्यान कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. पावसामुळे मुख्य उत्पादक महाराष्ट्रातील कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या कांदा उत्पादक राज्यांना अवकाळी आणि परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी  केंद्राने इराण आणि इजिप्तचा कांदा आयात केला आहे. त्यामुळे एकीकडे कांदा दर घसरण्याच्या शक्यतेची टांगती तलवार तर दुसरीकडे लिलाव बंद राहिल्यास कांदा सडण्याची भीती अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडला आहे.  

कांदा लिलाव सुरू करा: नाना बच्छाव
सर्व बाजारसमित्या तात्काळ सुरु करा आणि कांदा खरेदी करावा सरकारने कांद्याच्या संदर्भातील निर्णय त्वरित मागे घ्यावा शेतकऱ्यांना वेठीस धरु नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय रहाणार नाही.
 
नाना बच्छाव, कार्याध्यक्ष.शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य