नाशिक |प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील ११००० शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून प्राप्त झालेला लाभ वसुली व अपात्रतेच्या नोटीस देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांना कुठला ही लाभ देतांना अनेक कागद पत्रांची मागणी होऊन त्यात त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जाते. त्यांनतर त्या योजनांचा लाभ दिला जातो. लाभ द्यायचा आणि परत घ्यायचा असा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांना पाठवलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला.
पीएम किसान योजने अंतर्गत प्राप्त होणारा वार्षिक तीन हप्त्यात मिळणारा ६०००/- रूपयांचा लाभ या योजनेचा खुप गाजावाजा करण्यात आला होता. त्यात शेतकरी ७/१२ च्या आधारे लाभार्थी झाले होते. अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवत तहसीलदारांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकीकडे पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी त्यासंकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांची केंद्र सरकार थट्टा करत आहे असा आरोप कडलग यांनी केला. परस्पर खात्यावर पैसेही जमा होण्यास गेल्या दोन वर्षापासुन सुरूवात झाली होती. त्यात अनेक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात केली होती. परंतु कालपासून शेतकऱ्यांना पी एम योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. केंद्र सरकार अनेक फसव्या घोषणा करून जनेतेची थट्टा करत असल्याचाच हा प्रकार आहे असे ते म्हणाले.
प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा: पुरुषोत्तम कडलग
जिल्ह्यातील ११००० शेतकर्याना पाठविलेल्या ह्या नोटींसा परत घेण्यात याव्यात अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्या वतीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी दिली.
पुरुषोत्तम कडलग, जिल्हाधक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक