संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील गोदाकाठच्या गोदापात्रात दोन महिन्यांपासून अडकलेल्या पानवेली काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र राज्य बियाने उपसमितीचे सदस्य, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या शिवसेना स्टाईल "टाळे लावा" आंदोलनाचा धसका घेत आज सोमवारी (दि.२९) पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यामुळे खंडू बोडके-पाटील यांनी उद्या मंगळवार (दि.३०) पासून जाहीर केलेले कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला "टाळे लावा" आंदोलन स्थगित केले आहे.
गोदापात्रातील पानवेलीमुळे साथीचे आजार फैलावल्याने गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पानवेली काढण्याची वारंवार मागणी करूनही पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडू बोडके-पाटील यांनी थेट कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या कार्यालयाला ३० तारखेला टाळे ठोकून सायखेडा पुलावर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी खंडू बोडके-पाटील यांना आंदोलन न करण्याची विनंती केली होती. मात्र खंडू बोडके-पाटील आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याने अखेर आज सोमवारी अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यापुर्वी खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, सायखेडचे शाखा अभियंता खैरनार, नांदूरमध्यमेश्वरचे शाखा अभियंता शरद नागरे यांच्यासह शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे यांच्यासमवेत पानवेलींची पाहणी करून चर्चा केली.
यावेळी उपअभियंता निकम यांनी पानवेली काढण्यासाठी दोन पथके करणार असून सायखेड़ा, करंजगाव पुलावर अडकलेल्या पानवेली महीनाभरात बोटी व मनुष्यबळच्या सहाय्याने काढण्यात येतील असे सांगितले. तसेच सदर पानवेली नाशिक महानगरपालिका क्षेत्रातुन येत असल्याचे सांगितले. मात्र दरवर्षी गोदावरीला पानवेलीचा विळखा बसत असल्याने त्यावर निधीची तरदूत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी दिले. कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशीही खंडू बोडके-पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. पानवेली पाहणीवेळी सायखेडचे माजी उपसरपंच शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, करंजगाव शिवसेना गणप्रमुख सागर जाधव, माजी ग्रामपालिका सदस्य योगेश बोराडे, रमेश पाटील राजोळे, योगेश राजोळे आदि उपस्थित होते.
पानवेली काढण्यासाठी कायम स्वरुपी तरतूद असावी: बोडके
दरवर्षी पानवेलीमुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यावर देखभाल दुरुस्ती अतंर्गत निधीची तरतूद करून कायमस्वरूपी उपाययोजना पाटबंधारे विभागाने करावी. पाटबंधारे विभागाच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या उचल पाणी परवानगीसाठी यापुढे आपण लढा देणार आहोत.
श्री.खंडू बोडके-पाटील
माजी सरपंच करंजगाव
सदस्य : महाराष्ट्र राज्य बियाणे,
उपसमिति, मंत्रालय मुंबई.
(फ़ोटो)
१) पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, खैरनार यांच्याशी पानवेलींसंदर्भात चर्चा करताना खंडू बोडके-पाटील, शरद कुटे व शिष्टमंडळ
२) सायखेड़ा येथे बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास केलेला प्रारंभ