संतोष गिरी
निफाड| मुंबईत शिवाजी पार्क येथे निफाडच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष स्टॉल लावला होता, पण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी स्टॉल लावण्यास मज्जाव केला. स्थानिक बाजारात भाव नाही, मुंबईत विक्रीसाठी आलेली द्राक्ष विकू दिली जात नाही अशा द्विधा मनस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी थेट माजी आ. अनिल कदम यांच्याकडे कैफियत मांडली, मग काय कदम यांनी थेट मातोश्रीवर संपर्क करत या घटनेची कल्पना दिली. लागलीच शिवसैनिकांनी याठिकाणी धाव घेत कारवाई टाळली आणि द्राक्ष विक्रीसाठीची व्यवस्था करुन दिली कदम यांच्या पुढाकाराने त्यामुळे निफाडच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.
महाराष्ट्रातील निफाड तालुका हा देशातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो तसेच द्राक्षपंढरी म्हणूनही ओळखला जातो. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागले आहे. सुजलाम सुफलाम् समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या ज़िद्दीने कमावलेली निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल भावाने शेतकरी विकत आहेत. मात्र पिकेल ते विकेल या राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या संकल्पनेतील विक्री व्यवस्था नाशिकच्या द्राक्ष मंडळाने प्रत्यक्षात उतरवत निफाडची द्राक्ष मुंबईत विक्री करण्यासाठी पाठबळ दिले.
त्याअनुषंगाने खेरवाडीचे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक बाबाजी संगमनेरे व ग्रामपंचायत सदस्य कैलास संगमनेरे यांनी आपली द्राक्षे बुधवारी मुंबईत शिवाजी पार्क परिसरात विक्रीचा स्टॉल लावला होता, मात्र कोरोनाचे कारण देत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना द्राक्ष विक्रीस मज्जाव केला. याची तक्रार बाबाजी संगमनेरे यांनी निफाडचे शिवसेनेचे माजी आ. अनिल कदम यांच्याकडे केली,त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. योगायोगाने मुंबईला मंत्रालयात असलेले माजी आ. अनिल कदम यांनी तातडीने शिवसेना भवनात संपर्क साधून शिवसेनेच्या पदाधिकारयांना शिवाजी पार्क येथे घटनास्थळी पाठवले. शिवसेना पदाधिकारी यांच्या दणक्यानंतर त्या शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीचा तात्पुरता परवाना मिळवून देत द्राक्ष विक्री स्टॉल पूर्ववत केला.
त्यामुळे चांगल्या दराने निफाडची द्राक्ष विकली जाऊन खेरवाडीच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून कोरोनाच्या या महामारीत अनिल कदम यांनी केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या घटनेची निफाड तालुक्यातील सोशल मीडियात चांगली चर्चा रंगली होती. माजी आमदार अनिल कदम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खेरवाडीचे द्राक्ष उत्पादक शेतकरी व द्राक्ष विद्यमान मंडळ यांनी आभार मानले आहे.