नाशिक| शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका बघता नाशिक शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले.
मागील आठवड्यात फेम सिग्नल येथून औरंगाबाद महामार्गावर वळविण्यात आलेल्या अवजड वाहनाच्या अपघातामुळे आई व मुलगा यांचे दुखद निधन झाले होते. या मार्गावरील अवजड वाहनांच्या विरोधात स्थानिकांनी अनेकदा निवेदने देऊन या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करून आंदोलने केले आहे.
नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाहनधारकांची संख्या वाढल्याने रहदारीमध्ये वाढ झाली आहे. त्याकारणाने रस्त्यांची संख्या कमी पडू लागली आहे. मुंबई, पुणे या शहरानंतर नाशिकचा क्रमांक येत असल्याने मुंबई-पुणे शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका होऊ नये याकरिता मेट्रो सिटीप्रमाणे अवजड वाहनांना वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. अवजड वाहने नाशिक शहरातील रिंग रोड वरून वळविण्यात आल्याने लहान वाहने पर्यायी मुख्य मार्गाचा वापर करतात. परंतु या मुख्य मार्गावर सिटी बस, खाजगी बस व बांधकाम मालवाहतूक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. नाशिक शहरातील वाहनांची संख्या व वाहतूक कोंडीच्या प्रश्नांचा विचार दिवसा अवजड वाहनांना नाशिक शहरात प्रवेश बंदी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.