नाशिक| मला दिलेला सन्मान पाहून मला अतिशय भरून आले. या संमेलनाचा आवाका आणि परिस्थिती पाहून मला प्रथम काही सुचले असेल ते म्हणजे शासनाने मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे असे डोळे झाकून घोषित करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी केले.
कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलास पुरकर यांचा सन्मान स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, दादा गोऱ्हे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, स्वानंद बेदरकर उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक मनोहर शहाणे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत लक्ष्मीबाई टिळक आणि कवी कुसुमाग्रज यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कुसुमाग्रज यांनी मला लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे माझा हा सन्मान मला प्रेरणा देणाऱ्या कुसुमाग्रज व लक्ष्मीबाई टिळक यांना अर्पण करतो असे मनोहर शहाणे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण पट काही कथांमधून मांडला.
यावेळी ग्रंथलीचे सुदेश हिंगलास पुरकर म्हणाले की, महाराष्ट्रात गावा गावा जाऊन पुस्तके पोहचविणारी ग्रंथाली चळवळ असून ग्रंथालीने अद्याप पर्यंत १२०० पुस्तके प्रकाशित केले असून त्यातील ८०० पुस्तके ही नव लेखकांची असल्याचे त्यांनी सांगत हा पुरस्कार स्वीकारतांना आनंद होत असल्याचे सांगितले. आपले मूल्य कायम ठेऊन ग्रंथाली आपला प्रवास करत असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
*संमेलन स्थळी दिलीप पुराणिक यांचा विशेष सन्मान*
पाकिस्तान येथे असलेल्या मराठी भाषिकांशी दर सप्ताहात संवाद साधून मराठी भाषा रुजवीत असलेले दिलीप पुराणिक यांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, माजी अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उदघाटन कार्यक्रम पाकिस्तानात ऑनलाइन बघितला गेला असल्याची माहिती प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.
जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा म्हणजे 'गझल: डॉ. दिलीप पांढरपट्टे
नाशिक|जीवनातील प्रत्येक प्रसंग व विषय गझलेच्या माध्यमातून व्यक्त करता येत असतो. त्यामुळे गझल ही एक जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गझलकट्टा या कार्यक्रमात गझलेचे वर्णन केले आहे.
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गझलकट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, विनायक रानडे, कवी नरेश महाजन, गझलकार कमलाकर आबा देसले, खलील मोमीन, अरुण सोनवणे यांच्यासह रसिक प्रक्षेक उपस्थित होते.
सचिव गझलकार डॉ. पांढरपट्टे गझल व कवितेतील फरक सांगतांना म्हणाले की, एका कवितेमध्ये एकाच विषयाचा समावेश असतो तसे गझलमधील प्रत्येक शेर हा वेगळा असतो. रसिकांना समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत गझल असावी. गझलची निर्मिती ही उर्दु भाषेमध्ये झाली असली तरी मराठी भाषेतील गझलचा प्रवास सुरेश भट यांनी सुरू केला. सुरेश भट यांच्यासोबत पत्रामार्फत झालेला पहिला संवाद, 'तुला जर चांगले मार्गदर्शन मिळाले तर तू एक उत्तम गझलकार होशील. तुझा चाहता -सुरेश भट' हा अनुभव देखील डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी कथन केला. सुरेश भट यांनी समोरच्या साहित्यिकातील क्षमता ओळखून त्यांना लिहिण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, असेही गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.
उडवाच मान माझी, माझा नकार नाही.
इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही….
डॉ. पांढरपट्टे यांनी सादर केलेल्या या गझलेस प्रक्षेकांनी भरभरून दाद दिली.
गझलमंचच्या उद्घाटनानंतर सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अभिजात मराठी भाषा दालनास भेट दिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात येणारे पत्र ही त्यांनी टपाल पेटीत टाकले.
*सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल : सुनिल कडासने*
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक सुनिल कडासने म्हणाले, समृद्ध व सुदृढ समाज घडविण्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून तयार झालेला भक्ती संप्रदाय प्रेरक ठरत आहे. जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे ज्याने सर्व धर्मांचा व त्यांच्या सांस्कृतिचा स्विकार केला आहे. हे उर्दु गझलच्या रुपाने अनुभवास मिळते. गझलेच्या जन्माचा प्रवास सांगतांना ते म्हणाले, सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल आहे. यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर गझल सादर केल्या.
गझलमंचच्या पहिल्या सत्रात कमलाकर आबा देसले, खलील मोमीन व अरूण सोनवणे यांनी आपल्या गझल सादर केल्या.