नाशिक| शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सन 2019-20 पासून विमुक्त जाती- भटक्या जमाती (व्हीजेएनटी), इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) व विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) यांच्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 2021-22 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग (पुणे) चे संचालक दे.आ.गावडे यांनी केले आहे.
या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी राज्यातून दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर 200 च्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील नवीन संदेश या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा. विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज, कागदपत्रे , करारनामे व हमीपत्र यासह ‘ मा.संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001’ या पत्त्यावर 1 ऑगस्ट 2021 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे आणि पीएच.डी. साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल. तसेच, विद्यार्थी व पालक दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. या परदेश शिष्यवृत्तीसाठी प्रमुख अटी आहेत. असे गावडे यांनी सांगितले आहे.
