ठाणे| मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे … तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी श्री. देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित लोकशाही गप्पा – भाग 7 अंतर्गत ‘कशी होते मतदार नोंदणी’ या परिसंवादात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हानिवडणूक अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना घोलप, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोषकुमार सेंद्रे आदी या परिसंवादात सहभागी झाले होते. संवादक प्रणय चव्हाण व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभिषेक नेमाणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, उपप्राचार्य श्रीमती टोके, महेश पाटील, संदीप पागे, श्री. आठवले आदी उपस्थित होते.
