नाशिक|नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी २०२३ पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली अशी माहिती आयमाचे पदाधिकारी मनीष रावल यांनी दिली आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु ३ वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान १ , उडान २, उडान ३ मधील बिडिंग दरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला बगल दिली असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, अहमदाबाद आणि पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूएट आणि बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. परंतु ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून ऑपरेशन्स स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती.
याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगलोरशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हिंडन, हैदराबाद आणि पुणे या निवडकांना पुरस्कार देण्यात आला. आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र नाशिक नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून जानेवारी २०२३ पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणार्याह सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे.अलायन्स एअर ने ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि २७ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ते ऑपरेट करू शकले नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मंत्री ज्योतिरादित्य एम, सिंधिया यांनी पत्राद्वारे छगन भुजबळ यांना दिली आहे.

